नाशिकची नवोदित धावपटू ताई बामणे हिने युवा ऑलिंपिकला पात्र ठरत भारताची नवी वेगाची राणी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून बँकॉक येथे झालेल्या पात्रता फेरीत तिने पंधराशे मीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आणि युवा ऑलिंपिकची पात्रता मिळवली.... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख नवोदित धावपटू ताई बामणेबद्दल...
........................................
अनेक खेळाडू अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करत हे स्वप्न पूर्ण करतात. यातच आता ताई बामणे या धावपटूचे नाव समाविष्ट झाले आहे. पी. टी. उषा, शायनी विल्यम्स, सिमा पुनिया, ललिता बाबर आणि कविता राऊत यांच्या बरोबरीने नाशिकमधून ताई बामणेचे नाव नावारूपाला येत आहे. आता युवा ऑलिंपिकमध्ये पात्र ठरली असली, तरी मुख्य ऑलिंपिक हेच तिचे अंतिम ध्येय आहे. २०२४ आणि २०२८ या दोन ऑलिंपिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा तिचा निर्धार आहे.
नाशिक शहराने राज्याला आणि देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यातच आता ताईचे नावही देशात झळकले. लहानपणापासून ताईने धावण्याचा सराव सुरू केला आणि लवकरच शालेय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. तिच्या शाळेतील शिक्षक भगवान हिरकुड यांनी तिची गुणवत्ता हेरली आणि तिला जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी संधी दिली. हिरकुड सरांचा विश्वास सार्थ ठरवत ताईने त्याही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय प्रशिक्षक विरेंद्र सिंग यांनी घेतली व त्यांनी तिला भोसला सैनिकी शाळेत प्रवेश मिळवून दिला.
वडील हिरामण आणि आई हिराबाई यांच्या पाच अपत्यांपैकी ताई एक. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. नाशिकमधील हरसुलजवळच्या दलपतपूर नावाच्या लहानशा खेडयात ताईचा जन्म झाला. शाळेत असल्यापासूनच कविता राऊत तिची आदर्श होती. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर विजयवाडा येथील स्पर्धेसाठी ताईची निवड झाली. या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आणि यामुळेच तिची फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रशिक्षक शिबिरासाठी निवड झाली. या शिबिरात ताईने अथक मेहनत घेतली. तिने भारतात परतल्यावर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यात सुवर्ण पदकासह राष्ट्रीय विक्रमही साकार केला.
हळूहळू ताईचे नाव नाशिकसह संपूर्ण राज्यात नावारूपाला येते होते आणि त्यामुळेच गेल इंडिया या कंपनीने तिला खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले. त्यामुळे ताईला खुप मोलाची मदत झाली. या कंपनीच्या पाठबळावर ताई थायलंड आणि नैरोबी येथील मैदानी स्पर्धांमध्ये सहभागी झाली आणि त्यात यशस्वीही झाली. या कामगिरीमुळे ताईला उसेन बोल्ट अकादमीत प्रवेश मिळाला.
जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेल्या उसेन बोल्ट याने ही अकादमी नवोदित खेळाडूंसाठी सुरू केली आहे. ताई या अकादमीत दाखल झाली. या अकादमीत प्रवेश मिळवणारी ताई पहिलीच भारतीय महिला धावपटू ठरली आहे. या अकादमीत खडतर प्रशिक्षण व सराव केल्यानंतर अकादमीमार्फत ताईला जमैका येथील आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत ताईने सुवर्णपदक जिंकले. आठशे मीटर शर्यतीत मिळवलेले हे सुवर्णपदक तिच्या एकूणच कारकीर्दीला नवे वळण देणारे ठरले. आता तर तिची युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यात सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न तिने समोर ठेवले आहे. त्यानंतरही तिचा निर्धार आहे तो सर्वात प्रतिष्ठेचा म्हणजे ऑलिंपिक स्पर्धेतील पदकाचा. ताईकडे इतकी अफाट गुणवत्ता आहे, की ती २०२०मध्ये नाही पण २०२४ आणि २०२८च्या ऑलिंपिकमध्ये निश्चीतच देशासाठी पदक जिंकेल अशी आशा सर्वांना वाटते.
जागतिक मैदानी स्पर्धा, युवा ऑलिंपिक, आशियाई, आफ्रो-आशियाई, राष्ट्रकुल आणि मग ऑलिंपिक असे एकेक टप्पे पार करत ताई बामणे देशाची शान संपूर्ण जगात वाढवेल यात शंकाच नाही. आता केवळ गेल इंडियाच्या मदतीने हे सर्व शक्य होणार नाही, तर आता तिला इतर प्रायोजकांनी आणखी मोठ्या प्रमाणावर मदत करायला हवी. केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) या योजनेत ताईला समाविष्ट करून घेतले पाहिजे. यामुळे ताईला अत्याधुनिक सुविधा आणि सरावाची संधी तर मिळेलच, पण त्याबरोबरच आर्थिक स्थैर्यतादेखील मिळेल. अफाट गुणवत्ता असली तरी योग्य वेळी जर संधी मिळाली तर ताई तिचे स्वप्न पूर्ण करून देशाला ऑलिंपिक पदक निश्चितच मिळवून देईल.
- अमित डोंगरे
ई-मेल: amitdongre10@gmail.com
(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)